Sunday, 5 January 2020

महात्मा फुले यांची धर्म चिकित्सा


प्रस्तावना :
महात्मा फुले एकोणिसाव्या शतकातील महान सुधारक आहेत. त्यांनी सामाजिक बदल व परिवर्तनाची दिशा बदलुन शुद्र, अतिशुद्र, स्त्रीया, कामगार, शेतकरी इ. च्या उद्धाराकडे वळवली. महात्मा फुले यांच्या अगोदरच्या सुधारणा नावाला समतामुलक होत्या. परंतु व्यवहारात विविध प्रकारची चाकोरी, विषमता, अगणित भेदभाव व शोषणाच्या व्यवस्थेला आव्हान देण्याचे सामथ्र्य त्या सुधारणा चळवळींनी दाखवले नाही. तर प्रारंभी या सुधारणा मुलगामी नसून ढोबळ स्वरुपाच्या होत्या व विशेषत: ब्रिटीश प्रभावापासुन प्रारंभ झाल्या होत्या. दरम्यानच्या काळात जगभरात होणा·या सुधारणांचा परिणाम फुले यांच्यावर पडला. विशेषत: थॉमस पेन च्या 'द राईट्स ऑफ मन', हेनरी मीड, जॉर्ज वॉशिग्टंन, लिंकन इ. च्या प्रभावातुन सामाजिक सुधारणांना बळ मिळाले व 'विद्ये विना मती गेली' या सूत्राने उपेक्षित, वंचित, शोषितांना शिक्षणाचे महत्त्व पटवुन देवुन बहुजनांमध्ये जागृती व आत्मविश्वास निर्माण केला. हजारो वर्षांपासुन भौतिक आणि मानसिक गुलामगिरीत असणा·या सर्व शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले व धर्म चिकित्सेतुन बहुजनांच्या उद्धाराची दिशा निश्चित केली आहे. त्याचा संक्षिप्तपणे आढावा घेवु. 

धर्मचिकित्सा व एकेश्वरवाद :

भारतीय समाजव्यवस्थेचा हिंदु धर्म मुळ आधार आहे. धर्मांधतेतुन अनेक विषमता निर्माण झाल्या. ज्यामुळे शोषणाची व्यवस्था सर्व स्तरात कायम राहीली आहे. त्याचा सर्वाधिक फटका शुद्र, अतिशुद्र, स्त्रीया, कामगार, शेतकरी इ. शोषित व निम्नस्तरांना बसला व आजदेखिल कायम आहे.  धर्माच्या आधारावर होणारे व्यक्तींचे शोषण हे वाईट असुन धर्मासंबंधी मुलगामी विचार करण्याची आवश्यकता फुले यांनी प्रतिपादन केली आणि धर्माच्या आधारावर पसरलेला अत्याचार व वाईट प्रवृत्तीवर प्रहार केला आहे. प्रस्थापित व्यवस्थेतील उणीवांवर नेमके बोट ठेवुन पर्यायी धर्मव्यवस्था कशी उभी करता येईल? याचा विचार केला आहे व धर्माच्या नावाखाली होणारे शोषण थांबवुन शोषणमुक्त समाज निर्मितीचा मुलभूत विचार दिला आहे. महात्मा फुले यांनी धर्मचिकित्सा करुन धार्मिक थोतांडावर कडाडुन टिका केली, परंतु नास्तिक नव्हते. सातकार्यांची प्रेरणा ही परमेश्वरानीच दिली अशी प्रामाणिक भावना फुले यांची होती. सत्यशोध समाजाचे सदस्य प्रत्येक रविवारी (सायंकाळी) नियमितपणे एकत्र जमुन ईश्वराची उपासना करीत असत. एवढेच नाही तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे 'सत्य धर्म समाज' असे नामकरण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

बुद्धीप्रमाण्यता धर्माचा आधार असावा :

बुद्धीप्रमाणवादाचे आग्रही समर्थक असल्यामुळे 'ग्रंथ प्रमाण्य' त्यांनी स्पष्टपणे नाकारले होते. आपल्या समाजाची जडण घडणच मुळात धर्माच्या कुशीतुन झाल्यामुळे सर्व सामाजिक व आर्थिक प्रश्नांचा धागा कुठे न कुठे धर्माशी जोडला आहे. त्यामुळे येथील सामाजिक गतिशास्त्र समजुन घ्यायचे असेल आणि ते परिवर्तनाच्या प्रक्रियेत प्रभावीपणे राबवुन घ्यायचे तर धर्माशी फारकत घेवुन चालणार नाही, तर या दुष्ट धर्मसंकल्पनेला अनेक आव्हाने उभी करुन पर्यायी व्यवस्था निर्माण करता येते, अशी धारणा महात्मा फुले यांची होती. ख·या अर्थाने 1890 मध्ये प्रकाशित झालेल्या सार्वजनिक सत्य धर्म या संदर्भ ग्रंथात महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेल्या धर्माची संकल्पना मांडली आहे. तत्पुर्वी 1873 मध्ये स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या विविध उपक्रमातुन धार्मिक थोतांड, कर्मकांडावर हल्ले केले आहेत. व्याख्याने, लहान-लहान पुस्तीका, सत्यशोधक समाजाचा प्रचार व प्रसार इ. माध्यमातुन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारित झाली होती. कर्मकांडावर आघात, स्वार्थी भट व ब्राम्हणशाहीचा दांभिकपणा (ब्राम्हण जात नाही ब्राम्हण्यवाद या अर्थाने), बुवाबाजी, ज्योतिषवाल्यांनी जनमाणसात निर्माण केलेले दैववादाचे भय या पाशातुन जनसामान्याची सोडवणुक करण्यासाठी अनेक पर्यायी पाऊल उचलले आहेत. सर्वसामान्यांचे धार्मिक विधीच्या नावावर होणा·या शोषणातुन मुक्तीसाठी सत्यशोधक विवाह विधी, शुद्र-अतिशुद्र, स्त्रिया, शेतकरी, कामगार इ. मध्ये शिक्षणाच्या माध्यमातुन जागरुकता व आत्मविश्वास निर्माण करुन स्व हक्का विषयीच्या जागृतीचे बीजारोपण केले व यामुळे धर्मशास्त्रांची चिकित्सा करण्यात येवु लागली. सार्वजनिक जीवनात कर्मकांड, धार्मिक अवडंबर नाकारण्याचे सामथ्र्य शिक्षणामुळे प्राप्त झाले. 

धर्म : सार्वजनिक जीवनात समता -

1890 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा एक भाग म्हणुन धार्मिक विधी करण्याचे स्वातंत्र्य ब्रिटीश उच्च न्यायालयाने मान्य केले होते. यामध्ये सत्यशोधक समाज चळवळीचे मुख्य योगदान राहिलेले आहे. म्हणुन अभौतिक, गुढ धार्मिकतेच्या नावावर होणा·या शोषणाबद्दल जागरुकता निर्माण करुन धर्माची व्यावहारिक संकल्पना जनसामान्यात रुजवण्यास फुले यांच्या विचाराचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. धर्म अभौतिक व अद्भुत असुन धर्मावर विशिष्ट वर्गाचे प्रभुत्व आहे व सर्वसामान्यांचे शोषणाचे माध्यम आहे. म्हणुन धर्माची व्यावहारिकता सामान्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य महात्मा फुले व सत्यशोधक समाजाने केले आहे. उच्चवर्णीयांचा एक धर्म व दुसरा सर्वसामान्य जनतेचा आचरणशील धर्म असे दोन धर्म संकल्पना पूर्वीपासुनच हिंदु समाजामध्ये चालत आलेल्या होत्या. यापौकी दुसरी धर्म संकल्पनेशी महात्मा फुलेंनी नाते जोडलेले होते. म्हणुन सत्यशोधक चळवळीच्या उपक्रमात तळी उचलण्याचा विधी पार पाडला जात होता. बळी राजाच्या पुराण कथेचा आणि समाजाच्या उपरोक्त दोन स्तरात या कथेच्या संदर्भात दिसुन येणा·या परस्पराविरुद्ध अविष्कारांचा महात्मा फुले यांनी त्या दृष्टीने प्रभावी उपयोग करुन घेतला आहे. याचा विचार करता धर्माचे स्वरुप कर्मकांड, रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, मानसिक गुलामगिरी इ. प्रकारचा होता. याचा परिणाम असा झाला की, भट व पुरोहित वर्गाचाच अधिक फायदा झाला आणि शुद्र, अतिशुद्र, स्त्रीया इ. ना याचा सर्वाधिक फटका बसला. म्हणुन धार्मिकतेतुन निर्माण झालेली विषमता ताबडतोब नष्ट करणे गरजेचे होते. धर्मामुळे समाजामध्ये निर्माण झालेली अराजकता आणि भौतिक जीवनात आलेली दुरावस्था यांच्यातील आंतरसंबंध स्पष्टपणे जनतेच्या ध्यानात आणुन देण्याची नितांत गरज होती. दैववाद, थोतांड, मिथके ही जनमाणसात रुजवली होती. ती मोडुन काढणे गरजेचे होते. यासाठी शोषीतांमध्ये आत्मभान, जागरुकता निर्माण करुन भौतिक धर्म संकल्पनेचा उद्देश होता. आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक सत्ता निर्धारणामध्ये धर्माचा प्रभावीपणे वापर करण्यात येत होता. म्हणुन यावर प्रहार करणे फुले यांना महत्त्वाचे वाटत होते. 


निर्मिक व एकेश्वरवादाची संकल्पना :

धर्म व ईश्वर या संकल्पना एका नाण्याच्या दोन बाजु आहेत. म्हणुन सत्य धर्माला महात्मा फुले यांनी ईश्वर मानले आहे. तो निर्मिक आहे. 'मानवांचा एक धर्म' या 'अखंड' मध्ये लिहीतात की, 

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी। त्याचे भय मनी। धरा सर्व।।1।।
न्यायाने वस्तुचा उपभोग घ्यावा। आनंद करावा। भांडु नये।।2।।
धर्म राज्य भेद मानवा नसावे। सत्याने वर्तावे। ईशासाठी।।3।।
सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो। आर्यास सांगतो। जोती म्हणे।।4।।

प्रस्तुत अभंगामध्ये एकेश्वरवाद स्पष्ट केला आहे. या संदर्भाने महात्मा फुले मुस्लीम धर्मातील एकेश्वरवादाचे समर्थन करतात. महात्मा फुले यांनी ईश्वरास जगाचा निर्माता मानला आहे. जगाची निर्मिती  झाल्यानंतर पुढील सर्व बाबी विज्ञान व निसर्गनियमाने पार पडत असतात. हे नियम ईश्वरीय आहेत, हे मानायला हवेत व बुद्धी प्रामाण्याच्या आधारावर समजुन घेण्यात यावेत. निसर्गामध्ये घडणा·या घटनांच्या तपासणीसाठी बुद्धीप्रमाण्याने विचार करावा. संपूर्ण सत्याची प्रेरणा व्यक्तीला विवेकातुन प्राप्त होत असतो. म्हणुन सर्व व्यक्तीची निर्मिती ईश्वराने केलेली आहे. सर्व व्यक्ती समान असतात, समान अधिकार, नियम इ. चा मुलभूत आधार ईश्वर हाच आहे. ईश्वरावरील व्यक्तीची श्रद्धा व विश्वास व्यक्तीला सद्गुणी बनवतो. सत्य व असत्य या कर्माची फळे ईश्वर आपल्याला देत असतो. म्हणुन ईश्वरासंबंधी डेईस्टांचा युक्तीवाद महात्मा फुले यांनी मान्य केला आहे. 

ईश्वरासाठी महात्मा फुले यांनी 'निर्मिक' शब्दाचा उपयोग केला आहे. या माध्यमातुन व्यक्तीने एकमेकाशी कसे वर्तन करावे याचा स्त्रोत आहे. ईश्वर आणि व्यक्ती यांच्यातील आंतरसंबंध द्वंदात्मक आहेत. बदलत्या काळानुसार ईश्वरीय संकल्पनेत बदल होत आला आहे व पुढे चालु राहिल. वर्तमान काळात सामाजिक आदर्श व ईश्वर संकल्पना यांच्यात अंतर पडले असुन हे अंतर कमी झाल्याशिवाय सामाजिक परिवर्तनाला गती मिळणार नाही असे त्यांना वाटत होते. सृष्टीचा निर्माता एकच निर्मिक असून संपूर्ण माणसे त्याचे लेकरे आहेत. निर्मिक हा न्यायी, क्षमाशिल व जनतेचा उद्धारक आहे. मानवी बुद्धी, कल्पना, ज्ञानेंद्रियांच्या कसोटीवर तपासता येणार नाही. असीम, अतितेजस्वी, सत्यरुप आहे. त्याचा साक्षात्कार करुन घेण्यासाठी करण्यात येणारे नानाविध प्रयत्न मुर्खपणाचे आहेत. यापेक्षा व्यक्तीने एवढेच करावे की, सभोतालच्या परिस्थिती व सृष्टीची संपूर्ण माहिती करुन घ्यावी. सृष्टीच्या आंतरक्रियेतुन ईश्वराची इच्छा जाणुन घ्यावी. कृतज्ञतापूर्ण शरण जावे. यापेक्षा कोणतेही कर्मकांड करु नये, अशी महात्मा फुले यांची धारणा होती. महात्मा फुले यांचा निर्मिक भौतिकवादी असुन तो लौकिक, निर्गुण, निराकार ईश्वरापेक्षा व्यक्तीकडे संकेत करणारा आहे. व्यक्तीच्या धर्मविचाराची उद्दिष्टे त्यामुळेच पूर्णपणे भौतिक आहे. भट, पुरोहितांनी स्वार्थासाठी टिकवुन ठेवलेली कर्मकांडे, पुजा, नामस्मरण, नौवेद्य, पुनर्जन्म, अनुष्ठान, यज्ञयाग करणे म्हणजे धर्म नाही. धर्माच्या नावावर शुद्र, अतिशुद्रावर जाचक निर्बंध लादणा·या चातुवण्र्याचा धर्माशी काहीही संबंध नाही. एकही 'ग्रंथ प्रमाण्य' संपूर्ण सत्याला धरुन नाही. तर धर्म एकेश्वरनिष्ठा शुद्ध स्वरुपाची श्रद्धा, विवेक, समाजहित, नौतिक आचरण असा आहे, असा महात्मा फुले यांचा विचार होता. 


सारांश :

महात्मा फुले यांच्या धार्मिक विचाराची अतिशय संक्षेपाने चर्चा केली आहे. महात्मा फुले यांची धर्म संकल्पना व ही व्यवहारिक स्वरुपाची होती. धर्माच्या नावावर समाजात वाढलेले स्तोम, कर्मकांड, जातीवाद, वर्ण श्रेष्ठत्व हा सामाजिक बदलातील मोठा अडथळा आहे. सर्व भेद संपुष्टात येवुन समता मुलक समाज निर्माण करण्यासाठी सत्य धर्म व एकेश्वरवाद त्यांना अभिप्रेत होता. केवळ धर्मामुळेच भारतात समाजात विषमता निर्माण झाली आहे. सर्व शोषणाचे मुळ धर्म आहे. म्हणुन धर्म हा अलौकिक व गुढ भौतिकवादी नसुन तो समाजाच्या भौतिक सुख, समृद्धीत समान पद्धतीने वावरणारा व समान लेखणारा असावा म्हणुन वर्तमान धर्माची चिकित्सा करुन सत्य धर्माची वौज्ञानिक दिशा निर्धारित करुन नवसमाज निर्मितीला चालना दिली आहे. 


संदर्भ : 
1. फडके य. दी. (संपा.), महात्मा फुले समग्र वाङ्मय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई. 1991.
2. नरके हरी (संपा.), महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा, महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1998.
3. जोशी महेश, सत्यशोधक समाजाचा इतिहास, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, मुंबई. 
4. पाटणकर भारत, महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष, लोकवाङमय गृह, मुंबई, 1991.
5. साळुंखे आ. ह., महात्मा फुले आणि धर्म, लोकवाङमय गृह, मुंबई, 1992. 
6. http://archive.org 

No comments:

Post a Comment